संगमनेर: शेततळ्याच्या खड्ड्यात बुडून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू
Breaking News | Sangamner: अर्धवट काम झालेल्या शेततळ्याच्या खड्यात पावसाचे पाणी साचले, त्या पाण्यात बुडून तीन शाळकरी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची घटना.
संगमनेर : अर्धवट काम झालेल्या शेततळ्याच्या खड्यात पावसाचे पाणी साचले, त्या पाण्यात बुडून तीन शाळकरी विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. १५) संध्याकाळी ६.४० वाजेच्या पूर्वी संगमनेर तालुक्यातील मेंढवण येथे घडली. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
अनुष्का सोमनाथ बढे (वय : १०), सृष्टी उत्तम डापसे (वय: १३) व वैष्णवी अरुण जाधव (वय १२) अशी मृत मुलींची नावे आहेत. याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे-पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, मेंढवण गावच्या हद्दीत सोमनाथ बढे यांच्या शेततळ्याचे काम सुरू आहे. काही प्रमाणात काम झाले असून तेथे खोल खड्डा आहे. पाऊस झाल्याने त्या खड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. अनुष्का बढे, सृष्टी डापसे आणि वैष्णवी जाधव या तिघी मैत्रिणी शाळेतून घरी आल्या, त्यानंतर जेवण करून त्या शेततळ्याजवळ खेळण्यासाठी गेल्या होत्या. पाणी साचलेल्या मोठ्या खड्ड्यात त्या तिघी बुडाल्या.
या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक डुमणे-पाटील, पोलिस उपनिरीक्षक शालोमन सातपुते आदी घटनास्थळी पोहोचले. मुलींना पाण्यातून बाहेर काढत त्यांना घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. वाल्मीक रामभाऊ डापसे (वय ४५, रा. मेंढवण) यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Three female students died after drowning in a farm pit
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study