अहिल्यानगर: शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
Breaking News | Ahilyanagar: गेवराई येथील शेततळे फोडून पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
भेंडा | नेवासा : गेवराई (ता. नेवासा) येथे शनिवारी (दि. १०) दुपारी शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला. नेवासा फाटा येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर गेवराई येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मयूर संतोष शिनगारे (वय १२), पार्थ उद्धव काळे (वय ७) अशी शेततळ्यात बुडून मृत झालेल्या मुलांची नावे आहेत. मयूर हा इयत्ता पाचवीमध्ये, तर पार्थ हा इयत्ता दुसरीमध्ये शिकत होता. शनिवारी मयूर शिनगारे आणि पार्थ काळे हे दोघे आई-वडिलांबरोबर शेतात गेले होते. आई-वडील शेतात इतरत्र काम करीत होते. दुपारच्या सुमारास मयूर व पार्थ हे दोघे शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले. दोघांनाही पोहता येत नसल्याने पाण्यात बुडाले. बुडत असताना त्यांनी आरडाओरडा केला. तो आवाज मिरची तोडणीचे काम करत असलेल्या महिलांना गेला. महिलांनी मुले शेततळ्यात बुडत असल्याचे पाहून आरडाओरडा केला. मात्र, मदतीला इतर लोक येईपर्यंत दोन्ही मुले पाण्यात बुडाली. शेततळे ४० फूट खोल असल्याने इतर पोहणाऱ्या लोकांनाही त्या मुलांना बाहेर काढता आले नाही.
अखेर शेवटी जेसीबीच्या साहाय्याने शेततळे फोडून मुलांना बाहेर काढण्यात आले. त्यांना नेवासा फाटा येथील शासकीय रुग्णालयात आणले. तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाला होता. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पंधरा दिवसांपूर्वीच झाले होते शेततळे..
पंधरा दिवसांपूर्वीच उद्धव काळे यांनी शेततळे खोदले होते. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी शेततळ्यामध्ये पाणी भरले होते. त्यानंतर ही हृदयद्रावक घटना घडली.
Breaking News: Death of Shettaliat Budoon Don Shaalkari Mulancha