रक्षाबंधनासाठी निघालेल्या प्रवाशांची बोट बुडाली, ३० हून अधिक प्रवासी बेपत्ता
Banda Boat Accident: रक्षाबंधनासाठी निघालेल्या प्रवाशांची बोट यमुना नदीत उलटल्याने बोटीतील प्रवासी बेपत्ता.
बांदा: उत्तरप्रदेशात प्रवाशांची बोट बुडाल्याची भीषण दुर्घटना घडली आहे. रक्षाबंधनासाठी निघालेल्या प्रवाशांची बोट यमुना नदीत उलटल्याने बोटीतील जवळपास ३० पेक्षा अधिक प्रवासी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बांदा येथे ही घटना घडली आहे.
बोट बुडाल्याची माहिती मिळताच प्रशासनासह स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बोट बुडताच सुमारे आठ जण पोहत बाहेर आले. पोलिसांनी आतापर्यंत २ लहान मुलांसह एका महिलेचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला आहे. अजूनही जवळपास २० प्रवासी बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे ३० ते ३५ जणांना घेऊन ही बोट फतेहपूर जिल्ह्यातील जरौली घाटाकडे जात होती. नदीत मध्यभागी पोहोचताच जोरदार वाऱ्याने बोट उलटली, असे पोलिस अधीक्षक अभिनंदन यांनी सांगितले. आतापर्यंत चार जणांचे मृतदेह नदीतून बाहेर काढले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहेत.
मार्कापासून फतेहपूर, प्रयागराजपर्यंत लोक यमुना नदी पार करतात, त्यांच्या प्रवासाचे एकमेव साधन म्हणजे बोट आहे. बोटीत ३० ते ४० लोक नदीच्या एका काठावरून दुसऱ्या बाजूला नेले जातात. आज रक्षाबंधनाचा सण असल्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिक तसेच महिलांची संख्या सर्वाधिक होती. दरम्यान, बोटीतून प्रवास करीत असताना, अचानक सुसाट्याचा वारा आला. आणि या वाऱ्याने बोट उलटली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अपघाताची दखल घेतली आहे. योगी यांनी अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाठवले आहे.
Web Title: Boat of passengers leaving for Raksha Bandhan capsized