राजकारण आपला मार्ग नाही, फक्त आरक्षण द्या! जरांगे – पाटील कडाडले
Manoj Jarange Patil: राजकारण आपला पिंड नाही, कोणतीही निवडणूक आपण लढवणार नाही आणि समाजाशी कदापि गद्दारी करणार नाही.
जालना : आपल्या आंदोलनाची सर्वत्र चांगलीच हवा झाल्याने लोक याला राजकारणाशी जोडू पाहत आहेत. कुणी म्हणतेय आमदार व्हायचे, कुणी काय म्हणते, या सर्व केवळ चर्चा आहेत. यात तथ्य नाही. राजकारण आपला पिंड नाही, कोणतीही निवडणूक आपण लढवणार नाही आणि समाजाशी कदापि गद्दारी करणार नाही, असा विश्वास मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.
ते म्हणाले की, सभेसाठी कितीही गर्दी असली तरी कोणताही मराठा उद्या घरी थांबणार नाही. आता पहिल्या टप्प्यातील गावे झाली आहेत. पुन्हा दुसऱ्या टप्प्यात उर्वरित गावे घेतली जाणार आहेत. महामार्गाच्या कडेला असणाऱ्या गावागावांत येणाऱ्या सर्वांची व्यवस्था करण्यात आली आहे. मंदिर, शाळा, समाजमंदिर, सभागृह येथे सभेसाठी येणाऱ्या समाजबांधवांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. जिथे समाजबांधव थांबेल, तिथे स्वयंसेवक त्यांची व्यवस्था करणार आहे. कितीही गर्दी झाली तरी घरी थांबू नका, कार्यक्रमाला आवर्जून या, गावातही थांबू नका, आरक्षण पाहिजे तर घरी राहून न्याय मिळणार नाही, अशा शब्दात त्यांनी समाजबांधवांना साद घातली आहे.
सभेसाठी येणाऱ्या सर्वांना पोलीस प्रशासनाकडून सहकार्य केले जाणार आहे. सभेला येणाऱ्या सर्वांनी गाडीला झेंडे, स्टिकर लावावेत. त्यामुळे पोलीस सहकार्य करतील, सभेला शांततेत या आणि शांततेत जा, गाड्या हळू चालवा. सभेला येणाऱ्या प्रत्येकाने इथे स्वयंसेवक म्हणून काम अंतरवाली सराटी येथे करावे. सभेला येताना रुमाल, टोप्या आणाव्या, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.
सभेला आलेल्यांनी एकमेकांना उद्धट बोलू नये, कुणीही कुणाला दुखवू नये, पायाखाली मुंगीसुद्धा मरता कामा नये, मैदानाकडे कुणीही वाहन आणू नये. सर्वांनी याबाबत सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सर्वांनी शिस्तीचे पालन करावे, पोलिसांना त्रास देऊ नये, सभेसाठी तयार करण्यात आलेली आचारसंहिता पाळावी, सर्वांनी पोलिसांना सहकार्य करावे, सभेचा इतिहास शांततेत रचा, सर्वांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले.
घेतलेल्या पत्रकार परिषदेत मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला. अंतरवाली येथील सभेसाठी ७ कोटी रुपये खर्च होत असल्याचे सांगत मंत्री छगन भुजबळ यांनी हे पैसे कुठून आले, असा सवाल उपस्थित करून त्यांनी मनोज जरांगे-पाटलांवर टीका केली होती. अंतरवालीच्या मेळाव्यासाठी गोदाकाठच्या १२३ गावांव्यतिरक्ति इतर कुणाचे पाचशे रुपयेही घेतलेले नसल्याचे स्पष्ट करून जरांगे-पाटील यांनी सभेसाठी जमीन विकत घेतल्याचा भुजबळांचा गैरसमज झाला असावा, असे सांगत १२३ गावांपैकी फक्त ३१ गावांतील ग्रामस्थांनी खर्च केला असून उर्वरित गावाच्या पैशांची गरजही पडली नाही. त्यामुळे पैसे गोळा करण्याचा प्रश्न येतोच कुठे, असा सवाल केला.
मंत्री भुजबळ यांना कुणी बोलायला सांगत आहेत काय ? ते जे वक्तव्य करत आहेत, त्यासंदर्भात त्यांच्या नेत्यांनी त्यांना आवर घातला पाहिजे, अशी अपेक्षाही जरांगे-पाटलांनी व्यक्त केली.
त्यांनी मराठा द्वेष केला, धनगरांनाही फसवले!
आतापर्यंत मराठा समाजाने अनेकांना मोठे केले, त्यामध्ये येवल्यातील साहेबही आहेत. त्यांनी समाजाची जाणीव ठेवावी आणि मराठा द्वेष सोडून द्यावा. केवळ मराठा समाजच नव्हे तर त्यांनी धनगर बांधवांनाही फसवले आहे. त्यामुळे मराठा आणि धनगर एकत्र आले तर तुमचे कसे होईल, असा सवाल करून मराठा योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ यांचा समाचार घेतला.
Web Title: Politics is not your way, just give reservation Manoj Jarange Patil
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App