अहिल्यानगर: ३२ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याने खळबळ
Breaking News | Ahilyanagar: एक ३२ वर्षीय महिला अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र ही महिला बिबट्याने ओढून नेल्याची शंका उपस्थित.
राहुरी : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर परिसरातून एक ३२ वर्षीय महिला अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र ही महिला बिबट्याने ओढून नेल्याची शंका उपस्थित झाल्याने ग्रामस्थ व वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेतला, मात्र ती सापडली नाही.
तालुक्यातील बारागाव नांदूर व डिग्रस शिवरस्त्यावरील शेतात चारा आणण्यासाठी महिला गेली असता अचानक वेपत्ता झाली. महिला उशिरापर्यंत घरी न आल्याने नातेवाईकांनी तिचा शेतात शोध सुरू केला. मात्र ती मिळून आली नाही. त्यानंतर तिने चारा बांधण्यासाठी नेलेले कापड तिथे आढळून आले. त्यामुळे त्या महिलेला बिबट्याने त्यांच्या शेताजवळील असलेल्या उसाच्या शेतात ओढून नेल्याची शंका आली. त्यानंतर ग्रामस्थांनी या घटनेची माहिती वनविभागाला कळविली. वन विभागाचे वनपाल युवराज पाचरणे, वनक्षेत्रपाल राजू रायकर, कर्मचारी गोरक्षनाथ मोरे, ताराचंद गायकवाड आदींचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
महिलेच्या गळ्यातील पोत एका ठिकाणी सापडल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सदर महिला ही बेपत्ता असून तिचा शोध सुरू आहे. जोपर्यंत ती मिळून येत नाही तोपर्यंत निश्चित सांगता येणार नाही, असे राहुरी येथील वनपाल युवराज पाचारणे यांनी सांगितले.
Web Title: stir has erupted after a 32-year-old woman went missing