संगमनेर: ती सात गावे पुन्हा या पोलिस ठाण्याला जोडली
Sangamner News: महाविकास आघाडी सरकारने आश्वी पोलिस ठाण्यात समाविष्ठ असलेली ७ गावे संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात वर्ग केली होती. हा निर्णय महायुती सरकारने रद्द केला.
संगमनेर: महाविकास आघाडी सरकारने आश्वी पोलिस ठाण्यात समाविष्ठ असलेली ७ गावे संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात वर्ग केली होती. हा निर्णय महायुती सरकारने रद्द केला असून, ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेऊन ही सर्व गावे पुन्हा आश्वी पोलिस ठाण्यात वर्ग करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आश्वी पोलिस ठाण्यात समाविष्ट असलेली हंगेवाडी, कनोली, कनकापूर, ओझर बुदूक, ओझर खुर्द, रहीमपूर, मनोली ही सात गावे तालुका पोलिस ठाण्यास जोडण्यात आली. वास्तविक ही सर्व गावे संगमनेर येथील तालुका पोलिस ठाण्यापासून २० कि.मी. अंतरावर असल्याने ग्रामपंचायतींनी ठरावाद्वारे शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती.
या गावांमधील सर्व ग्रामस्थांनी तत्कालीन गृहमंत्री, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्याकडेही ग्रामपंचायतींचे ठराव पाठवून सदर गावे पूर्ववत आश्वी पोलिस ठाण्यात समाविष्ट करण्याची मागणी केली होती. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शासनस्तरावर हा निर्णय बदलण्याची मागणी करून याचा पाठपुरावा सातत्याने सुरू ठेवला होता, ही गावे पुन्हा आश्वी पोलिस ठाण्यात समाविष्ट करण्याबाबतचा निर्णय घेतल्याने ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्यातील गावांसाठी ग्रामस्थांच्याच मागणीनुसार ९ सप्टेंबर २०१३ रोजी आश्वी येथे स्वतंत्र पोलिस ठाणे मंजूर करून, त्याची कार्यवाही सुरू झाली. स्वतंत्र पोलिस स्टेशन नसल्यामुळे या भागातील नागरिकांना संगमनेर तालुका पोलिस ठाण्यातच कामासाठी जावे लागत होते. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने आश्वी येथे स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्माण झाल्याने या भागातील सर्वच गावांना मोठा दिलासा मिळाला आणि गुन्हेगारी कमी होण्यासही मदत झाली.
Web Title: Sangamner added seven villages again to ashwi police station
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App