Rangawa in Kothrud: गव्याच्या मृत्यूला कोण जबाबदार
Rangawa in Kothrud: गव्याच्या मृत्यूला कोण जबाबदार ???
कोथरूड पुणे… खरं तर एक गजबजाटीच शहर. याच शहरात आज (9 डिसेंबर 20) सकाळी गव्याने धुमाकूळ घातला. कोथरूड मधील महात्मा फुले सोसायटीत सकाळच्या सुमारास एक रानगवा लोकांच्या नजरेस पडला. नागरिकांनी याची माहिती संबंधित यंत्रणाना दिली. आणि सुरू झाला एकच थरार.
आज सकाळी सकाळीच निवांत असलेली यंत्रणा अचानक मिळालेल्या रानगव्याच्या माहिती नंतर खडबडून गेली. गव्याला पाहण्यासाठी गर्दी करणाऱ्या लोकांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला. वनविभागाचे अधिकारी व रेस्क्यू टीम कामाला लागली. महानगरपालिकेची अग्निशमन दलाची टीम देखील ऑपरेशन मध्ये सामील झाली. पाहता पाहता बातमी कोथरूड मध्ये पसरली. प्रसार माध्यमांच्या पत्रकारांचे केमेरे दुर्मिळ चित्र रेकोर्ड करण्यात व्यस्त झाले. पुढील अनेक तास हा गवा या सर्वांना गुंगारा देत फिरत होता. काहींनी घरातच टीव्हीवर एखाद्या क्रिकेट मॅच सारखा गव्याचा धुमाकूळ पाहिला. पाच पेक्षा अधिक तास चाललेला हा खेळ अखेर थांबला आणि गव्याला पकडण्यात यश आले. पुढे असे समजले की या गव्याने आपले प्राण गमावले.
आता बघा खरी हकीकत…
रानगवा…. म्हशी सारखा वाटणारा एक धिप्पाड जंगली प्राणी. जो कोल्हापूर भागात जास्त आढळतो. तो कोथरूड मध्ये कसा आला ? हा एक मोठा प्रश्न आहे. हा प्राणी स्वतःचा जीव वाचविण्यासाठी दुसऱ्यावर हल्ला करू शकतो. पण सुदैवाने कोथरूड मध्ये याने कुणावर हल्ला केल्याची बातमी नाही. फक्त गाड्यांचे नुकसान तेवढे या गव्याने केले आहे. काही लोक फक्त हा प्राणी पाहण्यासाठी इतके वेडे झाले होते की हा गवा त्यांच्या बाजूनी हुल देऊन गेला तरी त्यांना समजले नाही. गवा जवळ आला की स्वतःला वाचवण्यासाठी ही मंडळी वाट मिळेल तिथे पळू लागली, गेट वर चढू लागली. यंत्रणेला सहकार्य करायचं सोडून ही मंडळी फक्त गवा आणि यंत्रणेचं कार्य पाहायला गर्दी करत होती.
कोथरूड मध्ये रानगव्याचा मृत्यू झाला याला आता जवाबदार कोण ? उत्तर अनुत्तरित… मुळातच मानवी वस्तीत आल्याने त्याला काय करावे हे सुचले नाही. रात्रीच्या अंधारात कोथरूड पर्यंत तो आला. सकाळ उजाडली आणि सिमेंटच्या जंगलातली शांतता भंग होऊन माणूस नावाचा प्राणी बाहेर पडला. ही गर्दी पाहून गवा गोंधळून गेला. वाट चुकून आल्यानंतर जंगलात शिरकाव करण्यासाठी तो सैरावैरा धावू लागला. याच धावपळीत सैरभैर होऊन त्याने अनेक वाहनांना धडक दिली. यामुळे त्याच्या तोंडातून रक्तस्राव व्हायला लागला. गवा जखमी झाल्या नंतर इंजेक्शन देऊन त्याला पकडण्यात यश आले. पण यात त्याचा करूण अंत झाला. यामुळे हळहळ व्यक्त होणे साहजिकच आहे.
माणसाने स्वतःच्या स्वार्थासाठी फार पूर्वीपासूनच जंगलं उद्धवस्त केलीत. विकासाच्या नावाखाली जंगलांची कत्तल झाली आणि तिथं सिमेंटच्या इमारती उभ्या झाल्या. आता मागील वर्षीच मुंबईत मेट्रो कारशेड साठी तेव्हाच्या सरकारने ‘आरे’ मधील झाडं रातोरात जमीमदोस्त केली. पक्षांची घरटी जमिनीवर आली. असंख्य पक्षांचे पंख छाटले गेले. तर काही पक्षी अंड्यातून बाहेर येण्यापूर्वीच आरे मध्ये संपले.
माणसाच्या याच वृत्तीमुळे जंगली प्राणी शहरात येण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. ते आपल्या इथे नाही आपण मुळात त्यांच्या वस्तीत अतिक्रमण केलं आहे हे विसरून चालणार नाही. माणसाने स्वार्थापोटी केलेला निसर्गाचा हा ह्रास भविष्यात माणसालाच घातक ठरू शकतो. पण सध्या तरी माणसाच्या या गराळ्यात आज मात्र एका निष्पाप जीवाला प्राणाला मुकावे लागले याचीच खंत.
– संतोष दिवाडकर (युवा पत्रकार,कल्याण)
8767948054
Download App: Sangamner Akole News
See Also: Marriage Anniversary Wishes in Marathi
Web Title: Rangawa in Kothrud