राहुरी | Drawn: राहुरी तालुक्यातील कोळेवाडी गावात मंगळवारी सायंकाळी दुर्दैवी घटना घडली आहे. शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा पाय घसरून पाण्यात पडल्याने बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आनंदा यशवंत आंबेकर वय ७० रा. कोळेवाडी असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. आनंदा आंबेकर हे सकाळी आपले दोन बैल चारण्यासाठी शेतात गेले होते. बैल चारावयास सोडून आपल्या शेतात असलेल्या शेततळ्यातील माशांना खाद्य देण्यासाठी गेले असता पाय घसरून पाण्यात पडले. सायंकाळ झाली तरी ते घरी आले नाही म्हणून त्यांच्या घरचे त्यांना पाहण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी बैल चरताना आढळले तर इतरत्र शोध घेतले असता शेततळ्यात पाण्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. रात्री मृतदेह बाहेर काढून राहुरी येथील सरकारी दवाखान्यात पाठविण्यात आला आहे. राहुरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Web Title: Rahuri Farmer drowns in farm