15 दिवस घर बंद, डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडताच घरमालक हादरला
Vasai Suicide: बहीण-भावाने 25 लाखांच्या कर्जामुळे आत्महत्या केल्याची घटना.
वसई: येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एव्हरशाईन सिटीमधील मंगल वंदन सोसायटीत राहणाऱ्या बहीण-भावाने 25 लाखांच्या कर्जामुळे आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून ते आर्थिक अडचणीत होते. त्यांच्या घराचा दरवाजा 15 दिवसांपासून बंद असल्याने घरमालकाने पोलिसांना बोलावून, डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला असता, दोघांचेही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हनुमंता श्रीधर प्रसाद (40) आणि यमुना श्रीधर प्रसाद (45) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे वसईच्या एव्हरशाईन सिटीमधील मंगल वंदन सोसायटीत राहत होते. ते दोघेही कर्जबाजारी झाले होते. त्यांच्यावर 25 लाखांचे कर्ज होते. तसेच, ते कार्यालयातील काही लोक आणि मोठ्या भावाकडून उसने पैसे मागत होते.
या आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग न सापडल्याने दोघा बहीण-भावाने राहत्या घरातील बेडरूममध्ये विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. गेल्या पंधरा दिवसांपासून घराचा दरवाजा न उघडल्याने आणि घरातून दुर्गंधी येत असल्याने, घरमालकाने सोमवारी दुपारी 112 नंबरवर कॉल करून पोलिसांना बोलावले. पोलिसांनी डुप्लिकेट चावीच्या साहाय्याने घरात प्रवेश केला, तेव्हा दोघा बहीण-भावाचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आचोळे पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.
Web Title: House closed for 15 days, the owner was shocked suicide