Breaking News | Akole: तातडीच्या कारवाईमुळे हा बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश.
अकोले -तालुक्यातील पानसरवाडी येथील एका १६ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह भिंगार, अहिल्यानगर येथील २३ वर्षीय युवकाशी होणार होता. मात्र, अकोले तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे आणि अकोले पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांच्या तातडीच्या कारवाईमुळे हा बालविवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
बालविवाह होणार असल्याची माहिती मिळताच तहसीलदार डॉ. मोरे यांनी पोलिस निरीक्षक बोरसे यांच्याशी संपर्क साधून कारवाईस सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक अनिलराव
भारती यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी संबंधित मुलीच्या वडिलांना आणि मुलाच्या कुटुंबीयांना अकोले पोलीस ठाण्यात पाचारण केले. दोन्ही कुटुंबीयांना बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत समजावून सांगण्यात आले. समुपदेशनानंतर संबंधितांनी स्वतःहून हा विवाह थांबवण्याचा निर्णय घेतला. तसेच, मुलीच्या वडिलांकडून मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत विवाह न करण्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले.
मुलीच्या वडिलांनी, मुलगी अभ्यासात डोकं चालवत नाही, म्हणून तिचं लग्न लावत होतो असे धक्कादायक कारण दिल्याने अनेकांनी यावर आश्चर्य व्यक्त केले आहे. या घटनेनंतर अकोले तालुक्यात पुन्हा एकदा बालविवाहाचे प्रमाण वाढते की काय, अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सामाजिक संघटनांनी सजग राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. बालविवाह केल्यास केवळ वर-वधूचे पालकच नव्हे, तर फोटोग्राफर, बँडवाले, मंगल कार्यालय चालक, पुरोहित, मौलाना, पत्रिका छपाई करणारे, लग्नात उपस्थित नातेवाईक आदींवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. वराचे वय २१ वर्षे आणि वधूचे १८ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय लग्न करू नये, असे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
Breaking News: Child marriage stopped once again in Akole