संगमनेरात विधानसभेप्रमाणेच आगामी निवडणुकांत परिवर्तन होईल- राधाकृष्ण विखे-पाटील
Breaking News | Sangamner Elections: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यापूर्वी पक्षाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. वेळ येईल तेव्हा सर्वच जाहीर होईल.

संगमनेर : जिल्ह्यात अनेकजण भारतीय जनता पक्षामध्ये येण्यास इच्छुक असून, पक्षाची क्षमता वाढवू शकणाऱ्या लोकांना बरोबर घेण्याचे धोरण आहे. त्यादृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्यापूर्वी पक्षाच्या विस्ताराचे काम सुरू आहे. वेळ येईल तेव्हा सर्वच जाहीर होईल. संगमनेरमध्येसुद्धा अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी निवडणुकांमध्येसुद्धा मोठे परिवर्तन होईल, असे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.
शनिवारी (दि. २५) महायुतीच्यावतीने संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे दिवाळी फराळ स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी मंत्री विखे-पाटील, आमदार अमोल खताळ उपस्थित होते. त्यानंतर मंत्री विखे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांनी घेतलेल्या भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करताना मंत्री विखे-पाटील म्हणाले की, सुनीता भांगरे आणि अमित भांगरे यांनी भेट घेतली, या भेटीप्रसंगी माजी आमदार वैभव पिचड सुद्धा उपस्थित होते. अंतिम निर्णय होईल, असे स्पष्ट करून जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नुकत्याच
आमच्या निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीत गटतट बाजूला ठेवून महायुती जो उमेदवार देईल त्यापाठीमागे उभे राहण्याचे आवाहन करून तालुक्यात शत-प्रतिशत महायुतीला विजयी करण्याचा संकल्प करून निर्धार करण्याचे आवाहन मंत्री विखे-पाटील यांनी केले.
निवडणुकांच्यापूर्वी ‘ऑपरेशन लोटस’ निश्चित होईल. अनेकजण पक्षात येण्यास इच्छुक आहेत. संगमनेर तालुक्यातून कोणी इच्छुक आहे का?, या प्रश्नावर बोलताना वेळ येईल तेव्हा सर्व नावे पुढे येतील, असे ते म्हणाले.
नेवासा तालुक्यातील घटना मानवतेला काळिमा फासणारी असून, यासंदर्भात पोलिस उपमहासंचालक आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांची चर्चा झाली आहे. आरोपी कोणीही असो कारवाई होणारच. मात्र, संघाच्या कार्यकर्त्यांशी संबंध जोडून कोणी स्वतःचा बचाव करीत असेल तर ते शक्य होणार नाही. पोलिस चौकशी करून दोन-तीन दिवसांत अहवाल सादर करतील, असेही मंत्री विखे-पाटील म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील जनतेने विकासाचे बीज प्रज्वलित करून दिलेली संधी खूप मोठी आहे. त्यांच्या ऋणांतून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही. लोकांनी केलेले परिवर्तन विकासासाठी आहे. आगामी काळात आपल्याला तालुक्यात विकासाची प्रक्रिया पुढे घेऊनच जायची आहे, यासाठी जनतेची साथ हवी आहे. आता राज ठाकरेंना पुढे करून संगमनेर तालुक्यातील मतदारांचा अपमान करण्याचे काम सुरू आहे; परंतु यापूर्वी बोगस मतदान कोणी कसे घडविले, याची संपूर्ण आकडेवारी आपण काढली असून लवकरच ती जाहीर करणार असल्याचे आमदार अमोल खताळ म्हणाले.
Breaking News: hange in the upcoming elections like in the Sangamnerat Assembly
















































