‘मविआ’चा फॉर्म्युला ठरला : ठाकरे गट ९५, शरद पवार गट ८५ तर कॉंग्रेसला….
Maharashtra Vidhansabha Election 2024: काँग्रेसला १०५, उद्धव ठाकरे गटाला ९५ आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला ८५ जागा देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली.
मुंबई : उमेदवारी अर्ज भरण्याकरिता २४ ऑक्टोबरचा मुहूर्त साधण्यासाठी मंगळवारी रात्री उशिरापर्यंत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. त्यातून काँग्रेसला १०५, उद्धव ठाकरे गटाला ९५ आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला ८५ जागा देण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. विदर्भातील काही जागांवरून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात निर्माण झालेला वाद जवळपास शमला आहे. काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याऐवजी बाळासाहेब थोरात यांना उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठविले होते. त्यांनी विदर्भातील काही जागा ठाकरे गटाला देण्यास काँग्रेस पक्ष तयार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर थोरात यांनी सिल्व्हर ओक येथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. पाठोपाठ शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी विचारविनिमय केला.
मंगळवारी दिवसभर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकांचा सपाटा लावला होता. त्यातून काँग्रेसला १०५, ठाकरे गटाला ९५ आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीला ८५ जागा असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगण्यात आले. याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी येथील हॉटेल हयातमध्ये मविआच्या नेत्यांची रात्री बैठक पार पडली. आता आघाडीतील तिन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या याद्या बुधवारी (२३ ऑक्टोबर) जाहीर होणार आहेत. यातील काही उमेदवारांना आधीच एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
वादाचे पडसाद थेट दिल्लीपर्यंत
महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. मविआतील प्रत्येक पक्षाचे प्रत्येकी दोन ते तीन नेते या बैठकीला उपस्थित असायचे. या बैठकीत जागावाटपावर चर्चा व्हायची. विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर मविआच्या बैठकांमध्ये जास्त जोमाने चर्चा होऊ लागली. ही चर्चा अंतिम टप्प्यात आली असताना विदर्भातील काही जागांवरून कॉंग्रेस आणि ठाकरे गटात मोठा संघर्ष बघायला मिळाला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात वाद झाला. हा वाद शिगेला गेल्यामुळे त्याची दखल कॉंग्रेसच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागली.
Web Title: Maharashtra Vidhansabha Election 2024 formula of ‘Maha vikas aghadi ‘ was decided
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study