शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी ६० वर्षात काय केलं? अजित पवारांसमोरचं पंतप्रधान मोदींचा टोला
Shirdi News | Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या लोकार्पणसह विविध विकासकामांचे उद्घाटन.
शिर्डी: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते निळवंडे धरणाच्या लोकार्पणसह विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदींनी काकडी गावातील शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि कृषीमंत्री राहिलेल्या एका नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली.
यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, २०१४ च्या आधी महाराष्ट्रातील एक नेते देशाचे आणि राज्याचे कृषिमंत्री राहुन गेले. मात्र त्या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले. व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी गेल्या ६० वर्षांमध्ये शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्यांच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल होते. शेतकऱ्यांसाठी कुठलीच योजना काम करत नव्हती. शेतकऱ्यांना अनेकदा हेलपाटे मारावे लागत होते. मात्र, २०१४ नंतर हे चित्र बदलले. आमच्या सरकारने शेतकऱ्यांच्या सशक्तीकरणासाठी काम केले, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच शरद पवार यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला.
पुढे ते म्हणाले की, शरद पवार कृषीमंत्री असताना शेतकऱ्यांना पैशासाठी दलालांवर अवलंबून राहावे लागायचे, त्यांना महिनो-महिनो पैसे मिळत नव्हते. आमच्या सरकारने एमएसपीचा पैसा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या रब्बी पिंकासाठी एमएसपीची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये खूप शक्ती आहे. महाराष्ट्राचा विकास झाला तरच देशाचा विकास होणार आहे. राज्यामध्ये अनेक विकासकामे सुरु झाले आहेत. अनेक विकासकामे पूर्ण झाले आहेत. याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. ट्रान्सपोर्ट सेवेसंबंधी अनेक प्रकल्प सुरु करण्यात आले असून भारताला आपल्याला विकसित राष्ट्र करायचे आहे, असे मोदींनी सांगितले.
तसेच ६० वर्षांच्या कार्यकाळात शरद पवारांनी देशभरातील शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी रुपयांच्या एमएसपीवर अन्नधान्य खरेदी केले. दुसरीकडे आमच्या सरकारने सात वर्षांच्या काळात साडेतेरा लाख कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले आहेत. २०१४ च्या पूर्वी शेतकऱ्यांच्या मालाची ५०० ते ६०० कोटी रुपयांची एमएसपीवर खरेदी व्हायची, आमच्या सरकारने १ लाख १५ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.
Web Title: Sharad Pawar do for farmers in 60 years? Prime Minister Narendra Modi attack on Ajit Pawar
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App