पावसाचा हाहा:कार, अंडाभुर्जीचा स्टॉल वाचवण्यासाठी गेलेल्या तिघांचा वीजेचा करंट लागून मृत्यू
Breaking News | Pune Accident: तुफान पाऊस सुरु असताना विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना.
पुणे : जिल्ह्यात पावसाने चांगलाच हाहाकार केला आहे. सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून तुफान पाऊस सुरु असताना विजेचा शॉक लागून तिघांचा मृत्यू (Died) झाल्याची दुर्दैवी घटना पुलाची वाडी परिसरात घडली आहे.
अभिषेक अजय घाणेकर (25, रा. पुलाची वाडी, डेक्कन), आकाश विनायक माने (21, रा, पूलाची वाडी, डेक्कन) शिवा जिदबहादुर परिहार (18, नेपाळी कामगार) अशी मयतांची नावे आहेत.
पुण्यात रात्रभर मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाल्याचे चित्र आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे. सिंहगड रस्त्यावरील अनेक सोसायट्यांमध्ये पाणी घुसले आहे. या ठिकाणी मदतीसाठी कोणतीही यंत्रणा आली नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. या पाण्यात अनेक लोक अडकलेले आहेत. त्यातच आता पुलाची वाडी परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे.
रात्री तीन वाजेच्या सुमारास भिडे ब्रिज परिसरातील झेड ब्रिज खालील नदी पात्रात पाण्याची पातळी अचानक वाढली. या ब्रिज खाली अंडा भुर्जी स्टॉलवर काम करणारे तीन इसम अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेले होते. यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. त्यांना पहाटे पाच वाजता उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Web Title: Three people who went to save Andabhurji’s stall died due to electrocution
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study