Home संगमनेर संगमनेर तालुक्याच्या संरक्षणाचे आमदारकीचे कवच जनतेने गमाविले: थोरात

संगमनेर तालुक्याच्या संरक्षणाचे आमदारकीचे कवच जनतेने गमाविले: थोरात

Breaking News | Sangamner: तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

Sangamner taluka MLA's protection shield lost Thorat

संगमनेर: एकही दिवस विश्रांती न घेता सातत्याने चाळीस वर्षे काम केले. दुष्काळग्रस्तांसाठी धरण व कालवे पूर्ण केले. आपला तालुका, विविध सहकारी संस्था यांना आमदारकीचे संरक्षणाचे कवच होते. जातीधर्माच्या नावाखाली खोट्या भूलथापांमुळे हे कवच जनतेने घालवले असून तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळवण्याबरोबर तालुका जपण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर खुर्द येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सभासद शेतकरी युवक व कार्यकर्त्यांच्या स्नेहसंवाद मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब ओहोळ, रणजीतसिंह देशमुख, इंद्रजीत थोरात, संपत डोंगरे, नवीन संचालक रामनाथ कुटे, नवनाथ अरगडे, विनोद हासे, विजय राहणे, विलास शिंदे, अंकुश ताजणे, दिलीप नागरे, राजेंद्र चकोर, संतोष मांडेकर, भाऊराव रहाणे, सरपंच गणेश शिंदे, मधुकर गुंजाळ, रमेश सुपेकर आदी उपस्थित होते.

माजी मंत्री थोरात पुढे म्हणाले, धर्माच्या नावावर विधानसभा निवडणुकीत जनतेला फसवले गेले. विधानसभेच्या निवडणुकीनंतर तालुक्याची बसवलेली घडी थोडी विस्कटली. सरळ विरोधक परवडले पण दोन्हीकडे राहणारे नको.

आपला तालुका कुटुंब आहे. चुकीच्या पद्धतीने वागले तर त्याचा त्रास सर्वांना होतो. मागील 40 वर्षात एकही दिवस विश्रांती घेतली नाही. सातत्याने काम केले. धरण आणि कालवे आपणच पूर्ण केले. हक्काचे पाणी संगमनेर तालुक्याला मिळालेच पाहिजे. तालुक्यातील कालव्यांना प्लास्टरचे काम सुरू झाले. आपली पहिली मागणी होती की अगोदर आमच्या तालुक्यातील शेतकर्‍यांचे बारे काढून द्या आणि मग प्लास्टर करा. हे पाणी सर्वांना मिळालेच पाहिजे. ते काम आता होत आहे. मात्र, आमदारकी हे सर्व तालुका व सहकारी संस्थांना मोठे कवच होते. मात्र जनतेने ते कवच गमावले आहे. त्याचा लगेच त्रास सुरू झाला आहे. शहराजवळील गावांना आश्वी अप्पर तहसील कार्यालयाला जोडण्याचा डाव आहे. तर शहरामध्ये अशांतता निर्माण झाली आहे अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती.

आपले सुसंस्कृत राजकारण व संस्कृती टिकवण्यासाठी आपल्यातील मतभेद विसरून तालुक्याच्या कुटुंबासाठी संघटित होऊन संघर्ष करावा लागणार आहे. सर्व सहकारी संस्थांचे काम चांगले असून तालुक्यातील सर्व जनता व विरोधकही मान्य करतात. विधानसभेत चूक झाली असेल, परंतु आता सहकारी संस्थांच्या बाबत होणार नाही. झालेल्या चुका दुरुस्त करून सर्वांनी एकजुटीने तालुक्याच्या विकासासाठी एकत्र यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक सुभाष गुंजाळ यांनी केले तर रवी नेहे यांनी आभार मानले. यावेळी चंदनापुरी, आनंदवाडी, झोळे, संगमनेर खुर्द, खांडगाव, यशवंतनगर, निमज, सावरगाव तळ येथील सभासद शेतकरी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Breaking News: Sangamner taluka MLA’s protection shield lost Thorat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here