अहमदनगर शहरास हे नाव देण्यास मनसेची आक्रमक भूमिका
अहमदनगर | Ahmednagar: महाराष्ट्रामध्ये औरंगाबाद नंतर अहमदनगर शहराच्या नामांतराची चर्चा जोरात होऊ लागली आहे. अहमदनगर स्थापना दिनीच मनसेने अहमदनगर शहराचा नामांतराचा मुद्दा उचलून धरला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी शहरातील कायनेटिक चौकात अहमदनगर शहराला ‘अंबिकानगर’ असे नाव द्यावे अशी मागणी करणारा फलक उभा केला आहे.
व्हीआरडीईने चौकात उभारलेल्या सर्कलभोवती अंबिकानगरमध्ये आपले स्वागत आहे, असं फलकही लावले होते. अहमदनगरचे नाव बदलून अंबिकानगर करावे यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अहमदनगर शहरच्या स्थापना दिवशी आंदोलनामुळे मागणीला जोर आला आहे.
नामांतराची मागणी करताना मनसेने आपली भूमिका मांडली आहे. अहमदनगर शहराचे नाव पूर्वी अंबिकानगर असे होते. त्यामुळे अहमदनगरचे नाव अंबिका नगर झालेच पाहिजे यासाठी फलक लावून राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. नामकरण होण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जन आंदोलन उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला.
या आंदोलनात सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखाली प्रकाश गायकवाड, स्वप्निल वाघ, प्रमोद ठाकूर, ओमकार काळे, योगेश गुंड, पांडुरंग काळे, बंटी जगदाळे, महादेव दहिफळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Web Title: MNS’s aggressive role in naming the city of Ahmednagar