अहिल्यानगर: लग्नाच्या पहिल्याच रात्री लाखो रुपये घेऊन फरार; नवरदेव म्हणतो…
Breaking News | Ahilyanagar: अविवाहित तरुणांना लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका हाय-प्रोफाइल टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश.

अहिल्यानगर | कोपरगाव : अविवाहित तरुणांना लग्नाचं आमिष दाखवून लाखो रुपये उकळणाऱ्या एका हाय-प्रोफाइल टोळीचा कोपरगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. माहेगाव (ता. कोपरगाव) येथील एका तरुणाला जालना येथील रोशनी अशोक पवार नावाच्या ‘बनावट नवरी’सोबत लग्न लावून देत या टोळीने त्याच्याकडून तब्बल सव्वा दोन लाख रुपये उकळले. लग्नाच्या पहिल्याच रात्रीच्या पहाटे नवरीने पळ काढल्यानं, तरुणाला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. याप्रकरणी ‘बनावट नवरी’सह पाच आरोपींविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपी महिलेला पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव येथील एका अविवाहित तरुणाला लग्नासाठी मध्यस्थांमार्फत एक तरुणी दाखवण्यात आली. 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान चर्चा आणि हे लग्न पार पडले आणि तरुणाकडून मध्यस्थांनी सव्वा दोन लाख रुपये घेतले. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्रीच्या, पहाटेच्या सुमारास ‘नवरी’ घरातून पसार झाली. सकाळी फसवणूक झाल्याचं लक्षात येताच, तरुण आणि त्याच्या कुटुंबीयांनी मध्यस्थांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. अखेर तरुणाने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथील आरोपी महिला ज्योती राजू गायकवाड ही 16 ऑक्टोबर रोजी कोपरगावात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. कोपरगाव तालुका पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने ज्योती राजू गायकवाड हिला ताब्यात घेतलं. याच रात्री तिच्यासह, बनावट नवरी आणि तीन पुरुष साथीदारांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Breaking News: groom absconded with lakhs of rupees on the first night of the wedding
















































