आ. थोरातांच्या त्या विधानामुळे महाविकास आघाडीत नाराजी?
Breaking News | Balasaheb Thorat: महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून उलटसुलट चर्चा सुरु.
मुंबई: राज्यात विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राज्यभरात वेगवेगळ्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या सभा, मेळावे आणि आढावा बैठका होत आहेत. या सभांच्या माध्यमातून एकप्रकारे निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे अनेक नेत्यांचे राज्यभरात दौरै सुरु आहेत. या दौऱ्यांच्या माध्यमातून आगामी निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा मुख्य सामना रंगण्याची चिन्ह आहेत. मात्र, असे असले तरी महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अशातच आता काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे.
आज काँग्रेस पक्षाची कोकण विभागाची विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी एक आढावा बैठक पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील आदींसह काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना थोरात यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत हे वक्तव्य केले.
ते म्हणाले की, “महाराष्ट्रात काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा, असं वाटतंय. यात आश्चर्य वाटायचे कारण नाही. कारण पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच होणार आहे”, असे थोरात यांनी म्हटले. त्यामुळे आता मविआत मुख्यमंत्रीपदावरून नाराजीनाट्य रंगण्याची शक्यता आहे. तसेच महायुती सरकारला सत्तेचा अहंकार झाला आहे. सर्वसामान्य जनतेला चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातेवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे, आजही वाड्या वस्त्यावर ५० खोके एकदम ओके, हे विसरले नाहीत”, असे म्हणत थोरातांनी महायुतीवर निशाणा साधला.
थोरात पुढे म्हणाले की, “भ्रष्ट महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यालाच चार दिवसांनी सरकारमध्ये घेतले व तिजोरीच्या चाव्या दिल्या. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाऱ्यांनीच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतले. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल”, असेही त्यांनी म्हटले.
Web Title: come Displeasure in Mahavikas Aghadi due to Thorat’s statement
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study