भाजप आणि महायुतीच्या वाचाळविरांनी राजकारणाचा चिखल केला: आ. बाळासाहेब थोरात
Breaking News | Sangamner: देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बाबतीत जे कृत्य केले गेले, तेच कृत्य राहुल गांधींच्या बाबतीत करावे ही दुष्प्रवृत्ती निषेधार्ह.
संगमनेर: आमदार-संजय गायकवाड यांच्यापाठोपाठ अनिल बोंडे यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य म्हणजे आजची नथुराम गोडसे प्रवृत्ती आहे. त्यांचे वक्तव्य हे भाजप नेत्यांच्या सुचनेनुसार केले गेलेले आहे. भाजप आणि महायुतीच्या वाचाळविरांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल केला आहे, अशा तिखट शब्दांत माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी संताप व्यक्त केला आहे.
आमदार थोरात एका व्हिडीओ सदेशाद्वारे म्हणाले, पुरोगामी महाराष्ट्राची सुसंस्कृत राजकीय परंपरा संपवण्याचा उद्योग २०१४ ला सुरू झाला, तो रोज खालच्या पातळीवर जात आहे. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळिमा फासत आहेत. त्यांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा या वाचाळविरांना मूक पाठिंबा आहे, हे अत्यंत धोकादायक आहे. संजय गायकवाड आणि अनिल बोंडे यांच्यावर त्वरित कारवाई करण्याऐवजी त्यांना पाठीशी घालणारे त्यांच्या पक्षाचे नेते त्यांच्याएवढेच दोषी आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या बाबतीत जे कृत्य केले गेले, तेच कृत्य राहुल गांधींच्या बाबतीत करावे ही दुष्प्रवृत्ती निषेधार्ह आहे. गांधी हे केवळ आमचे नेते नाहीत, तर देशातले विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या बाबतीत या पातळीवर बोललं जात असेल, तर तुमच्या नेत्यांसंदर्भात सुद्धा वाईट बोलणं आम्हाला शक्य आहे; परंतु ती आमची संस्कृती नाही याची आठवणही थोरात यांनी करून दिली आहे. गायकवाड, बोंडेंना तर जनता शिक्षा देईलच; पण त्यांच्या कर्माची फळं त्यांना पाठिशी घालणाऱ्या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत, असा इशाराही आमदार थोरात यांनी दिला आहे.
Web Title: rhetoric of BJP and Mahayutti has muddied politics
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study